कांदा हे कंद प्रवर्गात मोडणारे अतिशय महत्वाचे भाजीपाला पिक आहे. जगातभारत कांदा उत्पादन व क्षेत्राच्या बाबतीत अग्रेसर असला, तरी प्रति हेक्टरी उत्पादकतेच्या बाबतीत बराच मागे आहे. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्येउत्पादन व क्षेत्राच्या बाबतीत आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यात कांद्याची लागवड केली जाते. कांद्याच्या प्रती हेक्टरी उत्पादन वाढीसाठी उच्च प्रतीच्या बियाणाची आवश्यकता असते पर्यायी कांदा बिजोत्पादन हे अतिशय महत्वाचे ठरते.

कांदा बियाणाच्या उत्पादनासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो. पहिल्या वर्षी मूलभूत किंवा पैदासकार बियाणापासून मातृकंद तयार करतात. नंतर दुस-या वर्षी या मातृकंदापासून बिजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो.
जमीन : कांदा बिजोत्पादनासाठी सुपिक, मध्यम ते मध्यम भारी, वाळूमिश्रित, भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा. तसेच हलक्या अथवा मुरमाड जमिनीत कांदा बिजोत्पादन घेऊ नये.
हवामान : कांदा हे मुख्यत: हिवाळी हंगामातील पीक आहे.महाराष्ट्रातील सौम्य हवामान कांदा लागवडीस उपुक्त आहे. कांदा लागवडीपासून 1 ते 2 महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्त असते.
विलगीकरण अंतर : अनुवांशिक शुद्धता राखण्याकरिता, परागीभवन प्रकारावरून विलगीकरण अंतर ठरविले जाते. कांदा पिकात परपरागीभवन होऊन फलधारणा होते. त्यामुळे दोन भिन्न जातींच्या बिजोत्पादन क्षेत्रामध्ये ५ मीटर तर पायाभूत आणि प्रमाणित बियाणे उत्पादनाकरीता अनुक्रमे १००० व ५०० मीटर अंतर आवश्यक आहे.
बिजोत्पादन पद्धती : कांद्याचे उत्पादन दोन पद्धतीने करता येते.
१. बियांपासून बी तयार करणे : या प्रकारात प्रथम ऑगस्ट मध्ये बियांपासून रोपे तयार केली जातात व नंतर रोप लागवण केली जाते. कांदा तयार झाल्यानंतर काढणी न करता तसाच शेतात ठेवला जातो. याच कांद्यापासून एप्रिल-मे महिन्यात बी तयार होते. परंतु या प्रकारात अनुवांशिक शुद्धता राखण्यात अडथळे येत असल्याने हि पध्दत आपल्याकडे वापरली जात नाही.
२. कांद्यापासून बी तयार करणे : गुणवत्तापूर्ण बिजोत्पादनासाठी या पद्धतीला शेतकऱ्यांची पसंती आहे. या पद्धतीमध्ये, प्रथम नेहमीप्रमाणे कांद्याचे पिक घेतले जाते व त्यापासून मिळालेल्या कांद्याचे (बेणे) बिजोत्पादन घेतले जाते. या पद्धतीचे दोन उपप्रकार आहेत.
अ) एकवर्षीय पध्दत : या पद्धतीमध्ये मे-जून महिण्यात गादी वाफ्यावर बियाणे पेरून रोपे तयार करावीत. रोपांची पुनर्लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यात करावी. कांदा साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला काढला जातो. हा काढलेला कांदा दोन ते तीन आठवडे शेतात सावलीत सुकवला जातो. जोड आणि डोंगळ कांदे काढून मध्यम आकाराचे एककेंद्री व रंग, आकाराने सारखे असणारे कांदे (बेणे) निवडून लागवड नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये केली जाते. जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत फुलांचे दांडे बाहेर पडून मे महिन्यापर्यंत बी तयार होते. महाराष्ट्रात या पद्धतीचा खरीप जातीच्या बिजोत्पादनासाठी वापर केल्या जातो.
ब) द्वीवर्षीय पद्धत : या पद्धतीमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिण्यात गादी वाफ्यावर बियाणे पेरून रोपे तयार केली जातात. रोपांची पुनर्लागवड डिसेंबर-जानेवारी महिन्यात केली जाते. मे महिन्यात कांदा काढणी करावी. यातून मध्यम आकाराचे, बारीक मानेचे व जातीच्या गुणधर्मानुसार कांदे निवडून त्यांची साठवणूक केली जाते. निवडलेल्या कांद्यांची (बेण्यांची) ऑक्टोबर महिन्यात लागवड केली जाते. डिसेंबर-जानेवारी मध्ये फुलकांडे निघून मे पर्यंत बी तयार होते. या पद्धतीचा रबी जातीच्या बिजोत्पादनासाठी वापर केल्या जातो.
बेण्याची निवड व लागवड : बिजोत्पादनाकारीता बेण्याचा (कांद्याचा) आकार आणि वजन यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. बेणे हे नेहमी बारीक मानेचे, मध्यम आकाराचे व जातीचा गुणधर्म दाखवणारे तसेच साठवणूकीस उत्तम असेच निवडावे. जोड, डोंगळ असलेले, मोठ्या आकाराचे व रोगट कांदे वापरू नयेत. लागवडीकरिता २.५ ते ३.५ से.मी. व्यासाचे, ४० ते ५० ग्रॅम वजनाचे कांदे वापरल्यास १५ ते २० क्विंटल बेणे लागते तर ४.५ ते ६.५ से.मी. व्यासाचे व ६० ते ७० ग्रॅम वजनाचे कांदे वापरल्यास २५ ते ३० क्विंटल बेणे लागते.
लागवडीची पध्दत व अंतर : लागवडीपूर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. लागवडीसाठी कांद्याचा मानेकडचा १/४ भाग कापून टाकावा जेणेकरून कोंब लवकर बाहेर पडतील. ऑक्टोबर-नोवेंबर च्या लागवडीकरिता सरी पद्धत व दोन ओळीतील अंतर ६० से.मी तर दोन झाडांमधील अंतर ३० से.मी. ठेवावे.
खत व्यवस्थापन : लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर २०-२५ टन शेणखत प्रती हेक्टरी मिसळावे. कांदा पिकास हेक्टरी ५०किलो नत्र, ५०किलो स्फूरद व ५०किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. त्यानंतर ३० व ४५ दिवसांनी५०किलो नत्र दोन भागात विभागून प्रति हेक्टरी दयावे.
आंतरमशागत : लागवडीनंतर शेतात तण दिसल्यास हलकी खुरपणी करावी. आवश्यकतेनुसार एक ते दोन वेळा कोळपणी करून शेत स्वच ठेवावे. ४०-४५ दिवसांनी निंदनी केल्यास तण नियंत्रित राहील.
पाणी व्यवस्थापन : जमिनीच्या मगदुरानुसार लागवडीनंतर ८-१० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. कांद्याच्या मुळापाशी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. बिजोत्पादन करताना विशेषकरून पिक फुलोऱ्यात आल्यानंतर आणि बीज धारणा होताना पाणी देणे आवश्यक आहे.
पिक संरक्षण : कांद्यामध्ये फुलकिडे व करपा या बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्याने रासायनिक औषधांच्या फवारण्या निरीक्षणाअंती कराव्या. शक्यतो फुले उम्ल्यानंतर फवारणी करणे टाळावे.
क्षेत्रीय तपासनी व भेसळ काढणे : बिजोत्पादन पद्धती नुसार कांदा बिजोत्पादन करताना पिकाच्या विवीध टप्यांवर क्षेत्रीय तपासणी करणे आवश्यक असते.
१. बियांपासून कांदा तयार करणे : या पद्धतीमध्ये दोन क्षेत्रीय तपासण्या आवश्यक आहेत. एक रोपांची पुनर्लागवड केल्यावर व दुसरी कांदा काढणी वेळेस.
२. कांद्यापासून बी तयार करणे : या पद्धतीमध्ये चार क्षेत्रीय तपासण्या कराव्यात. पहिली फुले येण्याच्या अगोदर, दुसरी व तिसरी पिक फुलोऱ्यात असताना आणि चौथी बियाणे परिपक्व होताना बियाणाची शुद्धता राखण्यासाठी भेसळ काढणे अतिशय आवश्यक आहे. बिजोत्पादन क्षेत्रातील रोगट तसेच जातीनुसार गुणधर्म न दाखवणारी झाडे काढून टाकावी. लागवडीसाठी बारीक मानेचे, मध्यम आकाराचे व जातीय गुणधर्म असणारे कांदे निवडावेत.
काढणी व उत्पादन : गोंडांचा रंग तपकिरी व त्यातून काळे बी दिसत असेल तर समजावे बियाणे काढणीला आले आहे. असे गोंडे १०-१५ से.मी. देठ ठेऊन कापून घ्यावेत. गोंडे एकाच वेळी परिपक्व होत नसल्याने, जसे तयार होतील तसे काढून घ्यावेत. काढलेले गोंडे स्वच्छ जागेवर उन्हात वळवून घ्यावे व हलकेसे काडीने बदडून बियाणे वेगळे काढावे. बियातीणाल केरकचरा वेगळा करून बियाणे स्वच्छ करून घ्यावे.स्वच्छ केलेले बियाणे कापडी पिशवी किंवा गोणीतसाठवून् ठेवावे. असे बियाणे १ वर्षापर्यंत टिकते. सर्वसाधारणपणे कांदा बियाणाचे प्रती हेक्टरी ६-८ क्विंटल उत्पादन मिळते.
डॉ. अंबालिका केशव चौधरी, डॉ. पुरुषोत्तम सुधाकरराव देशमुख,
एम.जी.एम., नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद. मोबाईल: ९८३४६६५९६५