पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने २०२१-२२ च्या सर्व हंगामातील खरेदीसाठी खरीप पिकासाठी किमान आधारभूत किंमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली असून, खरिप हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर झाल्या आहेत.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमधील उत्पन्नाच्या मोबदल्याची रास्त किंमत मिळावी, या उद्देशाने सरकारने खरीप पिकांचा किमान आधारभूत किमती (एमएसपी) वाढवल्या आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत यामध्ये सर्वाधिक वाढीची शिफारस तीळ ४५२ रुपये प्रति क्विंटल आणि त्यानंतर तूर आणि उडीद ३०० रुपये प्रति क्विंटलसाठी करण्यात आली आहे.
भूईमूग किंवा शेंगदाणा आणि नाचणी बाबतीत गतवर्षीच्या तुलनेत अनुक्रमे २७५ आणि २३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या पिकांची लागवड व्हावी म्हणून वेगवेगळ्या पिकांसाठी वेगळी किमान आधारभूत किमती (एमएसपी) जाहीर करण्यात आल्या आहेत.
भाताची गेल्यावर्षी (२०२०-२१) आधारभूत किंमत १८६८ रुपये होती त्यामध्ये ७२ रुपयांची वाढ करून ती आता (२०२१-२२) १९४० रुपये करण्यात आली आहे. भात ग्रेड अ ची गेल्यावर्षी आधारभूत किंमत १८८८ रुपये होती त्यामध्येही ७२ रुपये वाढ करण्यात आली असून, त्याची आता किंमत १९६० रुपये झाली आहे. संकरीत ज्वारीची मागील वर्षी आधारभूत किंमत २६२० रुपये होती त्यामध्ये यंदा ११८ रुपये वाढ करण्यात आली असून, त्याची किंमत २७३८ रुपये करण्यात आली आहे. मालदांडी ज्वारीची गेल्यावर्षी आधारभूत किंमत २६४० रुपये होती त्यामध्येही ११८ रुपये वाढ करण्यात आली असून, ती आता २७५८ रुपये झाली आहे. बाजरीची गेल्यावर्षी आधारभूत किंमत २१५० रुपये होती त्यामध्ये १०० रुपये वाढ करण्यात आली असून, ती आता २२५० रुपये झाली आहे. गेल्यावर्षी नाचणीची आधारभूत किंमत ३२९५ रुपये होती त्यामध्ये ८२ रुपयांची वाढ करण्यात आली असून, नाचणीची आधारभूत किंमत आता ३३७७ रुपये झाली आहे. मक्याची गेल्यावर्षी आधारभूत किंमत १८५० रुपये होती त्यामध्ये केवळ २० रुपये वाढ करण्यात आली असून, त्याची किंमत आता १८७० रुपये झाली आहे. तूरीची गेल्यावर्षी आधारभूत किंमत ६००० रुपये होती त्यामध्ये ३०० रुपये वाढ करण्यात आली असून, यंदा तूर ६३०० रुपये झाली आहे. मूगाची गेल्यावर्षी आधारभूत किंमत ७१९६ रुपये होती यंदा त्यामध्ये ७९ रुपये वाढ करण्यात आली असून, आता मूगाची आधारभूत किंमत ७२७५ रुपये झाली आहे. गेल्यावर्षी उडीदाची आधारभूत किंमत ६००० रुपये होती त्यामध्येही ३०० रुपये वाढ करण्यात आली असून आता त्याची किंमत ६३०० रुपये झाली आहे.
तेलबियांमध्ये भूईमूगाच्या गेल्यावर्षीच्या आधारभूत किंमतीमध्ये २७३ रुपये वाढ केल्याने यंदा भूईमूगाची किंमत ५५५० रुपये झाली आहे. ती गेल्यावर्षी ५२७५ रुपये होती. सुर्यफुलाची गेल्यावर्षी आधारभूत किंमत ५८८५ रुपये होती; त्यामध्ये यंदा १३० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्याची किंमत ६०१५ रुपये झाली आहे. सोयाबीनच्या आधारभूत किंमतीमध्ये यंदा केवळ ७० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सोयाबीनची किंमत ३८८० वरून ३९५० रुपये झाली आहे. तीळाच्या किंमतीमध्ये सर्वाधिक ४५२ रुपये वाढ करण्यात आल्याने तीळाची आधारभूत किंमत आता ७३०७ रुपये झाली आहे. गेल्यावर्षी तीळाची आधारभूत किंमत ६८५५ रुपये होती. कारळेची गेल्यावर्षी आधारभूत किंमत ६६९५ रुपये होती त्यामध्ये २३५ रुपये वाढ झाल्याने यंदा त्याची किंमत ६९६० रुपये झाली आहे.
तर कापसाच्या (मध्यम) आधारभूत किंमतीमध्ये २११ वाढ झाल्याने कापसाची किंमत ५५१५ वरून यंदा ५७२६ रुपये झाला आहे. तर मोठ्या कापसाच्या किंमतीमध्ये २०० रुपयांची वाढ झाल्याने तो आता ५८२५ वरून ६०२५ रुपयांवर गेल्या आहे.
२२२१-२२ साठी खरीप पिकांसाठी आधारभूत किंमती (एमएसपी) मधील वाढ अखिल भारतीय स्तरावरीलसरासरी उत्पादन खर्चाच्या (सीओपी) किमान १.५ पट पातळीवर आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९ च्या घोषणेनुसार निश्चित करण्यात आली आहे. शेतकर्यांना वाजवी मानधन मिळावे, या उद्देशाने आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्यात आलीय. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना अपेक्षित सर्वाधिक परतावा बाजरी (८५ %), उडीद (६५ %) आणि तूर (६२ %) या पिकांवर मिळेल असा अंदाज आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा