गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात वाढ होत असली तरी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जगात सर्वात मोठी खत पुरवठा करणार्या इफको कंपनीने 31 मार्चपर्यंत खतांच्या किमती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता इफकोने केलेल्या घोषणेनुसार डीएपीची किंमत 1200 रुपये, एनपीके 1175 रुपये आणि एनपीएस 1185 रुपये यांना एक पोते मिळेल. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी दरांमध्ये वाढ करणार नसल्याचं सांगण्यात आले आहे.
इफकोनं गेल्यावर्षीच्या रब्बी हंगामात देखील खतांच्या दरांमध्ये वाढ केली नव्हती. इफकोचे व्यावस्थापकीय संचालक यू. एस. अवस्थी यांनी ट्विटर ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच्याशी निगडीत असा निर्णय घेतल्यासचे सांगण्यात येते. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलांच्या किमती आणि भारतातील वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
इफको ही खतनिर्मिती क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी संस्था आसून, भारतात इफकोचे पाच प्लांट आहेत. याशिवाय इफकोने सामान्य विमा, ग्रामीण दूरसंचार, कृषी रसायन, खाद्यप्रक्रिया आणि जैविक शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करुन कंपनीचा नफा वाढवला आहे. गेल्या 54 वर्षांमध्ये इफको भारतीय शेतकऱ्यांना जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाचा वापर करत उच्च प्रतीचं खत पुरवठा करण्याचा प्रयत्न करीत आहे.
भारताला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हरित क्रांतीनंतर (1965-66) यूरीयाचा वापर सुरु करण्यात आला. 1980 मध्ये 60 लाख टन यूरिया वापरला जात होता. 2017 मध्ये यूरियाचा वापर 3 कोटी टनापर्यंत पोहोचला. 2018-19 मध्ये 320.20 लाख टन यूरीयाची विक्री झाली. तर, 2019-20 मध्ये 336.97 लाख टन यूरिया विकला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना नीम कोटेड यूरिया वापरण्याचा सल्ला दिला आहे. नीम कोटेड यूरियामुळे सामान्य यूरियापेक्षा प्रदूषण कमी होते.