कांदा उत्पादन व क्षेत्राच्या बाबतीत भारत जगात अग्रेसर असला, तरी प्रति हेक्टर उत्पादकतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक बराच खाली लागतो. कांदा पिकवणाऱ्या राज्यांत क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. भारतात कांद्याच्या जवळजवळ ३३ जाती विकसित झाल्या आहेत. परंतु ३-५ जाती प्रामुख्याने लागवडीसाठी वापरल्या जातात. एकूण क्षेत्राचा विचार केला तर शिफारस केलेल्या सुधारित जातींखाली फक्त ३० टक्के क्षेत्र येते. बाकी क्षेत्रावर शेतक-यांनी स्वत: तयार केलेल्या बियाणांची लागवड केली जाते. स्वत:चे बी तयार करीत असताना बीजोत्पादनाचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या वाणामध्ये नकळत निकृष्टपणा येत असतो. शिफारस केलेल्या सुधारित जातीचे बी वाजवी दरात आणि वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी स्वत:च बी तयार करण्याचा प्रयत्न करतो किंवा इतर शेतक-याकडे असणारे बी वापरतो.
कांदा पिकाचे बियाणे अल्पायुषी असते व त्याची उगवण क्षमता ही एक वर्षापुरतीच टिकून राहते त्यामुळे कांदा बियाणाचे उत्पादन दरवर्षी घ्यावे लागते. कांदा बियाणाच्या उत्पादनासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो. पहिल्या वर्षी मूलभूत किंवा पैदासकार बियाणापासून मातृकंद तयार करावीत. नंतर दुस-या वर्षी या मातृकंदापासून बियाणे उत्पादन कार्यक्रम घ्यावा. कांद्याच्या बिजोत्पादानाची पद्धत : कंदापासून बियाण्याची पद्धत : या पद्धतीमध्ये कंद तयार झाल्यानंतर काढून घेतात व चांगल्या रीतीने निवडून पुन्हा शेतात लागवड करतात. यामुळे कंदाची योग्य निवड शक्य होते. शुद्ध बियाणे तयार होऊन उत्पन्नदेखील जास्त प्रमाणत येते. या पद्धतीत खर्च वाढतो व वेळ देखील जास्त लागतो. तथापि, बीजोत्पादनासाठी हीच पद्धत योग्य आहे. एकवर्षीय पद्धत : या पद्धतीमध्ये मे-जून महिन्यात पेरणी करून रोप लावणी जुलै-ऑगस्टमध्ये करतात. नोव्हेंबर महिन्यात कंद तयार होतात. कंद काढून निवडून घेतले जातात. चांगल्या कंदांची १०-१५ दिवसानंतर पुन्हा दुसऱ्या शेतात लागवड करतात. या पद्धतीमुळे मे महिन्यापर्यंत बियाणे तयार होते. एक वर्षात बियाणे तयार झाल्याने यास एकवर्षीय पद्धत म्हणतात. या पद्धतीने खरीप कांद्याच्या प्रजातींचे बिजोत्पादन घेतात. द्वीवर्षीय पद्धत : या पद्धतीमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बियाणे पेरावे व रोपे डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीस शेतात लावावे. मेपर्यंत कांदे तयार होतात. निवडलेले कांदे ऑक्टोबरपर्यंत व्यवस्थित साठवून ठेवावेत. नोव्हेंबरमध्ये पुन्हा निवडून चांगल्या कंदांची शेतात लागवड करतात. या पद्धतीमुळे बियाणे तयार होण्यासाठी जवळपास दीड वर्ष वेळ लागतो. म्हणून यास द्वीवर्षीय पद्धत म्हणतात. या पद्धतीत रब्बी कांद्याच्या वाणांचे बिजोत्पादन करतात. जातींची निवड : महाराष्ट्रात बिजोत्पादानासाठी नाशिक लाल, नाशिक-२४१ (गावरान), पूना फुरसुंगी, फुले समर्थ, प्रशांत, पंचगंगा, गाजनन, ईस्ट वेस्ट, इ. जातींची निवड करतात. पुणे-फुरसुंगी जातीच्या बियाण्याची कमतरता लक्षात घेता बीजोत्पादनातून फायदा मिळतो. पुणे-फुरसुंगी जातीमध्ये कांदे काढणीनंतर अधिक काळ टिकण्याची क्षमता असल्याने त्या जातीची निवड करतात. या कांद्याला दर चांगला मिळत असल्यामुळे बियाण्याचीही किंमतही अधिक असते. रब्बी हंगामात कांदा लागवडीसाठी नाशिक-२४१ ही जात निवडावी. ही जात रब्बी हंगामात उच्च उत्पादनक्षमतेसाठी तसेच उत्तम साठवणूक क्षमतेसाठी चांगली आहे. कांदा मध्यम चपटगोल आकाराचा असून, डेंगळे येणे, डबल कांदा इत्यादी विकृतीत प्रतिकारक आहे. शेतकरी या वाणांस गरवा, भगवा अथवा गावरान या नावानेही ओळखतात. कृषी विद्यापीठातून या जातीचे मूलभूत बियाणे (ब्रिडर सीड) घ्यावे किंवा माहिती असलेल्या शेतकऱ्यांकडून खात्रीचे गोट वापरून सुधारित बीजोत्पादन घ्यावे. उत्पादन : कांद्याचे बियाण्यासाठी एकरी ३-५ क्विंटल इतके उत्पादन निघते. साठवणगृहात मध्यम आकाराचे एकसारखे कांदे ठेवावेत. कांदा साठविण्यापूर्वी दोन दिवसआधी कांदा चाळ झाडून स्वच्छ करावी. मॅन्कोझेबची (३ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी. साठवणुकीत दर महिन्याला एकदा अशी फवारणी केल्यास साठवणुकीत कांदा सडण्याचे प्रमाण खूपच कमी राहते. पावसाळी वातावरणात साठवणगृहाच्या तळाशी गंधकाची धुरी देण्याने कांदा सडत नाही. साठवणगृहामध्ये एकदा भरलेला कांदा बाहेर काढून हाताळू नये व त्यावरची पत्ती काढून टाकू नये. कांद्याची पत्ती संरक्षकाचे काम करत असल्यामुळे त्याचे जतन करणे अत्यावश्यक आहे. योग्य काळजी घेऊन कांदा साठविल्यास हा कांदा ६ ते ८ महिने उत्तम टिकतो. जातींची शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण : कांदा पिकात परपरागीभवन होऊन फलधारणा होते. दोन जाती बीजोत्पादनासाठी दीड कि.मी.च्या आत लावल्या किंवा रब्बी कांदा पिकात डेंगळे आले, तर परपरागीभवन होऊन जातींची शुद्धता राहत नाही. तेव्हा, जातींची शुद्धता राखण्यासाठी दोन जातींमध्ये बीजोत्पादन करते वेळी कमीत कमी दीड कि.मी. विलगीकरण अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय बीजोत्पादनाच्या शेजारी कांदा लागवड केली असेल आणि त्यात डेंगळे आले असतील, तर फुले उमलण्याअगोदर डेंगळे तोडणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, अन्यथा आपल्या चांगल्या जातीमध्ये डेंगळे येण्याची प्रवृत्ती वाढीस लागू शकते. विलगीकरण अंतर : • पायाभूत बियाणे- १००० मीटर • प्रमाणित बियाणे- ५०० मीटर शासनाच्या अधिकृत यादीमध्ये हे पीक नसल्याने या पिकाला कोणताही हमीभाव ठरवून दिलेला नाही. त्यामुळे उत्पादनाच्या आणि मागणीच्या प्रमाणावर या बियाण्याचे दर निश्चित होत असतात. निराशेच्या गर्तेतील शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीचे बेगड झुगारून कांदा बीजोत्पादनासाररख्या व्यावसायिक व फायदेशीर पीक पद्धतीची कास धरली तर आजच्या परिस्थितीत बदल होईल. शेतक-यांनी एकत्रित येऊन एका शिवारात किंवा गावात ठराव करून एकाच सुधारित जातीचा बीजोत्पादन कार्यक्रम राबवून लागणारे बी तयार केले तर बाजारपेठ शोधणे सोपे होईल.

चांगल्या प्रतीच्या कांदा बीजोत्पादनासाठी महत्वाचे नियोजन !
• कोणत्याही वाणाची उत्पादन क्षमता ही त्यामध्ये असलेल्या अनुवांशिक गुणधर्मावर अवलंबून असते त्यामुळे हि उत्पादन क्षमता टिकवून ठेवायची असेल तर त्यामध्ये बीजोत्पादन करताना कोणत्याही प्रकारे भेसळ होणार नाही याची काळजी घ्यावी..
• कांद्याचे बीज उत्पादन घेण्यासाठी कंदाची लागवड चांगल्या पाण्याचा निचरा होणाऱ्या व भारी जमिनीत करावी कांदा बीजोत्पादनासाठी थंड वातावरण लागते. साधारणतः दिवसाचे तापमान २५ डिग्री सेल्सिअस व रात्रीचे तापमान १० ते १५ डिग्री सेल्सिअस पिकाच्या वाढीसाठी पोषक असते.
• कंदाची निवड – कांदा काढणी नंतर ६ महिने जुना झालेला कांदा लागवडीसाठी निवडावा. एकसारख्या मध्यम आकाराचे, रंगाचे आणि वजनाचे कंद निवडावे. ५ ते ७ सेंमी व्यासाचा, ५० ते ८० ग्रॅम वजनाचा व एकच गाभा असणारा कांदा निवडावा. दुभाळका कांदा बीजोत्पादनासाठी घेऊ नये.
उत्तम कंदाची निवड
• लागवडीपूर्वी निवडलेल्या कांद्याचा पातीच्या बाजूचा १/३ भाग कापून त्याला बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. कांद्यामध्ये सगळ्यात जास्त परपरागीभवन होत असल्या कारणाने यामध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. म्हणून दोन कांदा बीजोत्पादन प्लॉटमधील अंतर ५०० ते १००० मीटर पेक्षा जास्त असावे. व लागवड ही ४५ * ३० सेंमी अंतरावर सरी वरंभा अथवा सपाट वाफा करून करावी.
• कांदा पिकात परपरागीभवन होत असल्यामुळे परागीभवनामध्ये मधमाशीचा महत्वाचा वाटा आहे. परंतु कांद्याच्या फुलांचा रंग सफेद असल्या कारणाने मधमाशी जास्त प्रमाणात आकर्षित होत नाही. यासाठी शेतात झेंडू, शेवंती यांसारख्या पिकाची आंतरपीक म्ह्णून लागवड करावी तसेच कांदयाला फुले लागण्याच्या अवस्थेनंतर रासायनिक कीटकनाशकांचा व बुरशीनाशकांचा वापर करणे टाळावा. जेणेकरून मधमाशींद्वारे परागीभवन चांगले होईल.
• पाणी व्यवस्थापनासाठी शक्यतो ठिबक अथवा पाट पाणी द्यावे. तुषार सिंचनाचा वापर करणे टाळावा. तसेच खतांचे व तणव्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे.
• ढगाळ हवामानात बियाण्याची चांगली गुणवत्ता येत नाही. यासाठी फुले लागल्यानंतर चिलेटेड कॅल्शियम @ ०. ५ ग्रॅम, बोरॉन @ १ ग्रॅम आणि प्लॅनोफिक्स @ ०.२५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. यामुळे फुलात बियाणे चांगले भरले जाऊन गुणवत्ता सुधारेल.
• बीजोत्पादनात फुलकिडे, मावा तसेच करपा कंदकूज/सड यांसारख्या समस्या येतात परंतु यासाठी वेळीच फुले लागण्यापूर्वीच नियोजन करावे. वाढीच्या अवस्थेत प्लॉट नेहमी पाहणी करावी व रोगी तसेच दुभाळके असलेले झाडे फुलोरा अवस्थेपूर्वीच काढून टाकावे.
उत्तम दर्जाची फुले
• लागवडी नंतर फुलांची काढणी साधारणतः ३ महिन्यांमध्ये चालू होते एकाच वेळी काढणी न करता जसे जसे फुल पक्व होईल तसे २ ते ३ टप्प्यात फुलांची काढणी करावी. गुणवत्ता पूर्ण बीज उत्पादनासाठी यापद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे.
प्रा. व्ही. डी. वाघमारे, डॉ. व्ही. डी. पाटील, प्रा. एस. एम राठोड रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालय, नाव्हा, पोस्ट नाव्हा, ता. जि. जालना, मो. 9403199937