माठ ही एक महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली महत्त्वाची पालेभाजी आहे. लहानांपासून ते अबालवृद्धापर्यंत सर्वांना आवडणारी अशी ही भाजी आहे. शरीर पोषणाला दृष्टीकोनातून माठाच्या पानांमध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय या भाजीमध्ये कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस ही खनिजे असतात. माठ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच चयापचय क्रिया सुलभतेने होते. कमी कालावधीत जास्त अर्थार्जन देणारे असे हे पीक आहे.
सुधारीत जाती : माठाच्या पालेभाजीसाठी शिफारस करण्यात आलेल्या जातीमध्ये प्रामुख्याने कोइमतूर-1, कोइमतूर-2, कोइमतूर-3, केरळ-1 आणि दुरंगी माठ, हिरवा माठ या जातींचा समावेश आहे. यापैकी दुरंगी माठ ही माठाची जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी विसकीत केली आहे. त्यास हिरवा आणि जांभळा हे दोन्ही रंग पानाखाली व पानावर दिसून येतात.

पूर्वमशात : माठ या पालेभाजीच्या लागवडीकरीता पाण्याचा उत्तम निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. भात कापणीनंतर वापसा असताना, जमिन 15 ते 20 सें. मी. खोल नांगरट करून भुसभूशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे व सपाट वाफे करून घ्यावेत.
पेरणी : माठाचे हेक्टरी 2 ते 2.5 किलो बियाणे लागते. एका ओळीमध्ये 20 सें. मी. अंतरावर पेरणी करावी. पेरणी 2 ते 3 सें. मी. खोलीवर करावी. बियाणे जास्त खोल पेरल्यास उगवण निट होत नाही. पेरणी ओळीमध्ये केल्यामुळे आंतरमशागत करणे सोपे जाते. याशिवाय बियाण्याचा वापरही योग्य प्रमाणात होतो. प्रथम वाफ्याना हलकेसे पाणी देऊन जमिनीस वापसा आल्यानंतर पेरणी करावी; म्हणजे बियाणे पाण्याबरोबर वाहून जाण्याचा धोका उद्भवत नाही.
पाणी व्यवस्थापन : पिकास पाणी योग्य प्रमाणात आणि एकसारखे मिळण्यासाठी रानबांधणी करणे आवश्यक असते. त्यासाठी 1.5 मीटर रूंदीचे आणि 5 ते 6 मीटर लांबीचे सारावाफे तयार करून घ्यावेत. रब्बी हंगामात 4 ते 5 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
खत व्यवस्थापन : मशागतीच्या वेळी दिलेल्या शेणखताशिवाय पेरणीपूर्वी ओळीमध्ये 5 ते 7 सें. मी. खोलीवर हेक्टरी 40 ते 50 किलो नत्र, 25 ते 30 किलो स्फुरद आणि 25 ते 30 किलो पालाश मिसळून घ्यावे. त्यानंतर माठ उगवून आल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी 25 ग्रॅम युरिया दहा लिटर पाण्यात मिसळून पानांवर फवारणी केल्यास पिकाची वाढ चांगली होते. प्रत सुधारते आणि पीक काढणीस लवकर तयार होते. पहिली कापणी झाल्यानंतर ओळीलगत पाच सें. मी. अंतर 5 ते 7 सें.मी. खोलीवर प्रति हेक्टरी 20 ते 25 किलो नत्र याप्रमाणात नत्राची दुसरी मात्रा द्यावी. त्याचबरोबर हेक्टरी पाच टन कुजलेले शेणखत दिल्यास पिकाची वाढ जोमाने होते.
तणव्यवस्थापन : माठाची उगवण झाल्यानंतर दहा दिवसाच्या अंतराने दोन निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे. माठ काढणीच्या वेळी पिकामध्ये तण असल्यास माठाबरोबर जुडीमध्ये तणांचा अंतर्भाव राहतो आणि जूडीस बाजारामध्ये योग्य किंमत मिळत नाही.
काढणी : हिरव्या, कोवळ्या आणि लुसलुशीत माठास चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे सुमारे 15 ते 18 सें.मी. वाढलेल्या माठाची कापणी करावी. नंतर जुड्या बांधून माठ बाजारात विक्रीसाठी न्यावा. पहिली कापणी झाल्यानंतर दुसरी कापणी 15 दिवसानंतर करावी. प्रत्येक कापणीनंतर सेंद्रिय व रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
उत्पन्न : प्रति हेक्टरी 10 ते 15 टन उत्पन्न मिळते.