द्राक्ष हे अति नाजूक पीक असून ते किडी रोगांना त्वरित बळी पडते आणि पिकाचे मोठे नुकसान होते. व्यापारी दृष्टिकोनातून या पिकास महत्त्व आलेले आहे. परंतु जागतिक बाजारपेठेत द्राक्ष पीक निरोगी आणि अवशेष मुक्त असेल तरच द्राक्षाला चांगली मागणी असते. द्राक्ष पिकावर पडणारे खतरनाक रोग उपायांशिवाय नियंत्रीत होवूच शकत नाहीत. त्यामुळे त्या रोगांची ओळख होणे महत्त्वाचे असते.
भारतात द्राक्षे शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात द्राक्षे लागवड ही सर्वात जास्त केली जाते. पश्चिम महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे लागवड ही लक्षणीय आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रातील एकूण द्राक्षे उत्पादनाच्या 70 टक्के उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यात पावलो पावली द्राक्षेच्या बागा आपल्याला पाहवयास मिळतील हेच कारण आहे की नाशिक जिल्ह्याला वाईन सिटी म्हणुन प्रसिद्धी मिळाली आहे. द्राक्षे हे चवीला खुपच रुचकर असते शिवाय याचे सेवन मानवी आरोग्यासाठी लाभदायक असते.
द्राक्षेच्या या गुणांमुळे याची मागणी ही वर्षभर बनलेली असते त्यामुळे द्राक्षे पिकाला भारतात तसेच महाराष्ट्रात चांगला मोठा बाजार उपलब्ध आहे. त्यामुळे भारतात तसेच महाराष्ट्रात याची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकरी बांधव करतात आणि चांगला नफा मिळवतात. महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान ह्या राज्यात देखील द्राक्षे लागवड केली जाते. द्राक्षे लागवड शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पाडते परंतु जर या पिकात रोगाचा शिरकाव झाला तर मग द्राक्षे लागवड शेतकऱ्यासाठी तोट्याचे सिद्ध होते. त्यासाठी वेळेवर द्राक्षे पिकात लागलेल्या रोगावर नियंत्रण मिळवणे गरजेचे असते.
थ्रीप्स : थ्रिप्स अंडाकृती, काळ्या रंगाचे लहान किडी असतात या किडी नेहमी पानांच्या खालच्या बाजूला आपली अंडी जमा करतात. निम्फस म्हणजे बाल अवस्थेतील किड आणि प्रौढ अवस्थेतील थ्रीप्स किड दोघेही पानाच्या खालच्या बाजूचा रस चोखतात. प्रभावित भाग लांबून देखील ओळखणे शक्य असते. थ्रिप्स द्राक्षे पिकाच्या फुलोरावर आणि नवीन येणाऱ्या द्राक्षेच्या घडावर देखील हल्ला करतात. प्रभावित द्राक्षेचे फळ क्रॉकी लेयर विकसित करतात आणि पिकल्यांनंतर ही प्रभावित फळे तपकिरी रंगाची होतात.
नियंत्रण : फॉस्फेमिडियन (0.05%) किंवा मोनोक्रोटोफॉस (0.1%) किंवा मॅलॅथिऑन (0.05%) सारख्या कीटकनाशकांच्या फवारण्या थ्रीप्स किडीवर चांगले नियंत्रण मिळवून देतात. या फवारणी मुळे द्राक्षे पिकाची होणारी हानी कमी करता येते. द्राक्षे पिकाला फुल लागल्यानंतर नंतर आणि फळांच्या वाढीदरम्यान प्रोफिलेक्टिक स्प्रे म्हणजे कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक आहे आणि तसा सल्ला द्राक्षे उत्पादक शेतकरी देखील देतात.
हेही वाचा :
द्राक्षावरील मिलीबग्ज् (पिठ्या ढेकूण)चे असे करा नियंत्रण
थंडीत फळबागांची अशी घ्या काळजी
लीफ स्पॉट : लीफ स्पॉट या रोगामुळे, द्राक्षेच्या पत्तीवर गोलाकार किंवा अनियमित आकाराचे गडद तपकिरी किंवा फक्त तपकिरी ठिपके तयार होतात. त्यामुळेच या रोगाला लीफ स्पॉट असे नाव पडले आहे. या गोलाकार ठिपक्यांचा मध्य भाग हा राखाडी रंगाचा असतो. या लीफ स्पॉटचे प्रमाण पिकावर वाढायला लागले की, प्रकाश संश्लेषण क्रियेवर विपरीत परिणाम होतो आणि पिकाच्या वाढीला लागणारं पोषकतत्वे पिकाला मिळत नाहीत व द्राक्षे फळांची वाढ त्यामुळे खुंटते परिणामी ह्यामुळे द्राक्ष उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो.
नियंत्रण : या लीफ स्पॉट रोगाच्या प्रतिबंधासाठी रोगग्रस्त, प्रभावित पाने गोळा करून जाळली पाहिजेत. जेव्हा या रोगाची लक्षणे पानावर दिसायला सुरवात होते तेव्हा 3.0 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड किंवा 2.5 ग्रॅम झिनेब प्रति लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार करून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. यामुळे या रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते आणि उत्पादन वाढवता येते.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा