उष्ण लाटेने विदर्भ होरपळत असतानाच राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. ढगाळ हवामानासह उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. 7) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, नैऋृत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह मंदावल्याने महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमनही लांबले असून, विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

काल सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये ब्रह्मपुरी, गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वर्धा, नागपूर येथे 45 अंशांपेक्षा अधिक, अकोला, अमरावती येथे 44 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यातही उन्हाचा चटका कायम असून, उकाडा चांगलाच वाढत आहे.

पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर पूर्व उत्तर प्रदेशापासून बांगलादेशापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असून, त्यापासून श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आज (ता. 7) विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
काल सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे 38.4, धुळे 41.0, जळगाव 43.0, कोल्हापूर 33.7, महाबळेश्वर 30.2, नाशिक 36.8, निफाड 37.2, सांगली 35.9, सातारा 38.1, सोलापूर 41.8, सांताक्रूझ 34.1, डहाणू 34.5, रत्नागिरी 33.8, औरंगाबाद 41.2, परभणी 43.3, नांदेड 41.0, अकोला 44.8, अमरावती 44.2, बुलडाणा 40.0, ब्रह्मपुरी 46.2, चंद्रपूर 35.4, गोंदिया 46.2, नागपूर 45.2, वर्धा 45.0.
नैऋृत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांश भाग व्यापून गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारल्यानंतर मान्सूनची वाटचाल थांबली आहे. प्रवाह मंदावल्याने महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमनही लांबले आहे. साधारणतः आज (7 जून) रोजी मान्सून तळ कोकणात दाखल होत असतो. मात्र यंदा मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त टळणार आहे. यातच संपूर्ण ईशान्य भारतासह सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्याच्या हिमालयाकडील भागात मान्सून दाखल झाल्यानंतर या भागातही मान्सूनची वाटचाल थांबली आहे.
दरम्यान, विर्दर्भातील वर्धा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देनुअत आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1