शेतकऱ्यांना आपल्या भागातील हवामानाचा अचूक माहिती मिळावी तसेच जमीन आणि पाणी या विषयी तंतोतंत आणि अचूक माहिती मिळावी यासाठी हवामान विभागाच्या वतीने संपूर्ण देशात सुरू करण्यात येणार्या सुमारे २०० कृषी हवामान स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रापैकी महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात येणार आहेत.
आवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ, ढगाळ वातावरण, याचा शेतकऱ्यांना अचूक अंदाज मिळावी, यासाठी देशात सुमारे २०० कृषी पर्जन्यमापक केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये जवळ-जवळ दहा केंद्रे महाराष्ट्रात सुरू करण्यात येणार असून, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, वाशिम, नागपूर, गडचिरोली, बुलढाणा, भंडारा, नंदुरबार या १० जिल्ह्यांमध्ये कृषी स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्र सुरू होणार आहे. लेक केंद्राच्या उभारणीचे काम चालू करण्यात आले असून, येत्या पावसाळ्यापूर्वी ती कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज अचूक मिळत नसल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान होते. मात्र या केंद्रामुळे हे नुकसान टाळता येणार आहे. तसेच नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करताना तलाठी, कृषी सहाय्यक अधिकारी यांना अचूक माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक लाभापासून वंचीत रहावे लागत होते ते आता यामुळे होणार नाही. विशेषत: पीक विम्यासाठी याचा अधिक फायदा होणार आहे.
उपकरण विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना जमिनीतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग त्यामुळे होणारे जमिनीचे बाष्पीभवन हे पिकाच्या वाढीसाठी आणि पिकाला पाणी देण्यासाठी महत्त्वाचे असते. या कृषी केंद्राच्या सहाय्याने शेतकऱ्यांना त्यांच्या भागातील जमिनीतील आर्द्रता, कमाल व किमान तापमान, वाऱ्याचा वेग आणि दिशा याबद्दलची माहिती दिली जाईल.
त्याचबरोबर जमिनीत किती खोलवर ओलावा आहे, तसेच संबंधित जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे याची माहितीकरून दिली जाणार आहे. देशभरातील जवळपास दोनशे कृषी हवामान स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्र उभारण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून येत्या पावसाळ्यापूर्वी ही केंद्र सुरू होतील.
शेतीमित्र मासिक आता.. शेतकर्यांच्या मोबाईलवर ! # शेतीविषयक आधुनिक माहिती वेळोवेळी मिळविण्यासाठी शेतीमित्र मासिकाचे फेसबुक पेज लाईक करा !