बाजारात चांगली मागणी असलेल्या लाल रंगाच्या कांद्याबाबत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता लाल रंगाच्या उन्हाळी कांद्याप्रमाणे चांगली टिकवण क्षमता असलेला कांद्याचा नवीन वाण शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्या धरतीवर राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राकडून हा नवीन वाण विकसित करण्यात आला आहे.
कांदा हे एक नगदी पीक आहे मात्र कांद्याच्या बाजारभावात स्थिरता नाही. त्यामुळे हे नगदी पीक शेतकऱ्यांसाठी अनेकदा कांदा उत्पादन तोट्याचे ठरते. सध्या तर बाजारात कांद्याला निचांकी भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत कांदा पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढणे शेतकऱ्यांसाठी मुश्किल झाले आहे. सध्या बाजारात लाल कांद्याची आवक होत आहे. मात्र हा लाल कांदा अधिक काळ साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे त्याला भावही मिळत नाही.
लाल कांदा दिसायला आकर्षक असल्याने त्याला बाजारात चांगली मागणीही असते. मात्र लाल कांदा अधिक काळ साठवून ठेवता येत नसल्याने काढणी केल्यानंतर लागलीच बाजारात पाठवावा लागतो. बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने त्याला चांगला दर मिळत नाही. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या नवीन वाणामुळे चागला भाव मिळणार आहे.
कांद्यावर नेहमीच वेगवेगळे संशोधन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन संस्थेने हा नवीन वाण विकसित केले आहे. या कांद्याला एनएचआरडीएफ फुरसुंगी असे नाव देण्यात आले आहे.
या नवीन जातीपासून हेक्टरी 400 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळणार आहे. लागवड केल्यानंतर मात्र 110 ते 120 दिवसात यापासून उत्पादन मिळू शकणार आहे. तसेच या कांद्याची टिकवण क्षमता पाच ते सात महिने राहील असा दावा करण्यात आला आहे.
एवढेच नाही तर या नवीन जातीवर करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होणार आहे. साठवणुकीत या कांद्याचा कलर देखील काळपट होणार नाही, कलर बदलणार नाही असाही दावा केला जात आहे. येत्या 15 ऑगस्ट पासून हे बियाणे चितेगाव येथील संशोधन केंद्रावर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा
👇 👇 👇